माधवराव पेशव्यांकडून कार्यमग्नता घ्या – मोहन शेटे
थेऊर
थेऊर प्रतिनिधी
दि. १३ : राज्यकारभार करताना स्वतः पराक्रम करायचा आणि त्याचबरोबर राज्यकारभाराचा एक आणि एक कागद डोळ्यात तेल घालून तपासायचा, यासाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक ऊर्जा लागते, रोज दीड हजार जोर काढून त्यांनी ही ऊर्जा कमावली होती,
त्यामुळंच इतक्या कमी वयात ते पराक्रम करू शकले. त्यांचे स्मरण करताना त्यांची कार्यमग्नता आपण आपल्यात बाणवली पाहिजे, असं मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी व्यक्त केलं.
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने रमा-माधव यांच्या २५३ व्या स्मृती दिनानिमित्त श्री क्षेत्र थेऊर येथे त्यांचे व्याख्यान झाले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंदार महाराज देव, महादेव काकडे, नवनाथ काकडे, गोविंद तारु, वैभव बडदे, राजाराम काकडे, संतोष काकडे, मयूर कुंजीर, गणेश गावडे उपस्थित होते.
शेटे म्हणाले, महापुरुष शरीराने गेले तरी त्यांचं कार्य अमर असतं. मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेपर्यंत विस्तारण्याचं महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
त्यांच्या कर्तृत्वामुळेच भगवा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकला असं सांगून शेटे यांनी माधवराव पेशव्यांची कारकिर्द उलगडून दाखवली. त्यांचे निधन झाल्यावर त्यांची पत्नी रमाबाई या सती गेल्या. हा हृदयद्रावक प्रसंग आपल्या वाणीने शेटे यांनी अक्षरशः जिवंत केला.
नवनाथ काकडे म्हणाले, जो ऐकतो तोच ऐकवू शकतो. त्यामुळंच महापुरुषांच्या कथा आपण ऐकल्या पाहिजेत. त्यांच्या जगण्यातली शिकवण या कथांच्या माध्यमातूनच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. त्यांचा पराक्रम, त्यांचे कर्तृत्व आजही थेऊरच्या मातीत जिवंत आहे.
विध्वंस म्हणाले, थेऊरला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा युवा पिढीकडे तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा.
कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीगणेशाची आरती झाली. त्यानंतर श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक इथं सर्वांनी अभिवादन केले.
त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात रमा-माधव पालखी निघाली. कार्यक्रमाला थेऊर विद्यामंदिर शाळेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदन तेजस्विनी गांधी कुलकर्णी यांनी केले. आभार केशव विध्वंस यांनी मानले.























