बारामती नगर परिषदेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या संत सावता माळी सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी झालो.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामती पोलीस पाटील संघटनेतर्फे पूरग्रस्त बांधवांसाठी ४० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यासाठी त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी नागरिकांना पर्यावरणपूरक आणि स्वच्छ-सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं. त्याचप्रमाणे नद्यांचं प्रदूषण रोखण्यात, कचऱ्याच्या योग्य नियोजनात आणि स्वच्छतेच्या कामात प्रत्येकानं हातभार लावावा, असं देखील आवाहन केलं.
शहरातील गुन्हेगारी, अतिक्रमण आणि अस्वच्छता टाळण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचं यावेळी नमूद केलं. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. कचरा टाकणाऱ्यास दंड आणि अस्वच्छता पसरवणाऱ्याची माहिती देणाऱ्यास रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल, अशी माहिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिली.
फूटपाथ हे पादचाऱ्यांसाठी आहेत. ते स्वच्छ व मुक्त ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. संत सावता माळी यांच्या शिकवणीप्रमाणे कर्तव्यनिष्ठ, परिश्रमी आणि प्रामाणिक राहून काम सर्वांनी केलं पाहिजे, असं सूचित केलं.























